हवामान बदलाचे नवे संकट | A new crisis of climate change

Environmental pollution and climate change
Climate-change

हवामान बदलाचे नवे संकट  

पर्यावरणाच्या प्रदुषणामुळे सृष्टीच्या हवामानात कमालीचे बदल घडत आहेत आणि ही परिस्थिती शेती, कृषि उद्योग आणि इतर उद्योगधंदे यांच्यासाठी अतिशय बाधक आहे. मात्र ही परिस्थिती कीड-रोग उत्पत्तीला अनुकूल आहे. सृष्टीच्या हवामानात वेगवेगळे घटक असतात, त्या घटकातील कमी-जास्तपणा म्हणजेच हवामान बदल होय. परतुं हा हवामान बदल कशामुळे होत आहे? त्याचे दुष्परिणाम आणि त्यांवरील उपाय याबाबींवर संशोधन करणे आणि त्यानुसार पावले उचलणे ही सध्याच्या काळाची प्रमुख गरज बनली आहे. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • हवामान बदलाच्या संकटाची सुरूवात
  • थेट सूर्यप्रकाश जास्त धोकादायक
  • हवामान बदलचा अहवाल काय म्हणतो? 
  • हवामान बदलाचे दुष्परिणाम 
  • हवामान बदलाचे पशुंपक्षांवर होणारे परिणाम
  • पीक उत्पादनावर होणारे परिणाम
  • शेतीबाबत उपाययोजना
  • निष्कर्ष

हवामान बदलाच्या संकटाची सुरूवात | The beginning of the climate change crisis

खरतर हवामान बदल ही काही ताबडतोब घडणारी किंवा परिणाम दाखविणारी बाब नाही. ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे. माणसांमध्ये जेव्हा नैसर्गिक बाबींवर स्वत:च्या विकासाठी नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला, थोडक्यात निसर्गचक्रात ढवळाढवळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हापासूनच हवामान बदलाच्या संकटास सुरूवात झाली. त्याचे परिणाम दिसायला लागल्यामुळे मानवाने आता हवामान बदल कशामुळे होते, त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल आणि त्यामुळे झालेल्या दुष्परिणामांचा सामना कसा करायचा यावर गंभीरपणे विचार करायला सुरूवात केली आहे. त्यात वातावरण, हिम आणि बर्फ, नद्या, सागर आणि महासागर, इतर जलयंत्रणा, तसेच अनेक सजीव यांची परस्परावलंबी आणि महत्त्वाची भूमिका असते. 

थेट सूर्यप्रकाश जास्त धोकादायक | Direct sunlight on Earth is more dangerous   

या संपूर्ण हवामान प्रणालीस उर्जा पुरविण्याचे काम सूर्य करतो. सूर्याची किरणे जर सरळ पृथ्वीवर आलीअसती तर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती. परंतु सूर्याच्या सरळ येणार्‍या किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम पृथ्वीवरील वायूंच्या पडद्यामुळे शक्य होते. वाढत्या औद्योगिकरणामुळे आपले सूर्यप्रकाशापासून रक्षण करणार्‍या वायुंच्या पडद्यावर आता वाईट परिणाम होत आहेत आणि त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान हळुहळू वाढत आहे. आता तर, हवामान बदलामुळे २१ वे शतक संपेपर्यंत जागतिक तापमान सुमारे ४ ते ६ अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहे. म्हणूनच हवामान बदलाच्या दुष्परिणामांनी आता प्रत्यक्ष आपल्या जीवनावर विपरीत प्रभाव टाकायला सुरूवात केली आहे. 

हवामानतील बदलांची चर्चा गेल्या २०-२२ वर्षांपासून सुरू आहे. जागतिक हवामान संघटना आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने १९८८ साली याकरिता इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजची (आयपीसीसी) स्थापना केली. त्याद्वारे काही शास्त्रीय संशोधन आणि अनेक देशांतील आकडेवारी गोळा करून हवामान बदलाची शक्यता पडताळून पाहण्यात आली. आतापर्यंत या पॅनलचे चार अहवाल सादर झाले आहेत. २००७ मध्ये दिलेल्या अहवालाने तर हा विषय जागतिक स्थरावर नेऊन बसवला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम याबाबतचा विषय सर्वदूर पसरविला. नंतर या पॅनलला आणि हवामान बदलासंबंधी जनजागृती करणार्‍या अल् गोर यांना २००७ साली शांंततेचे नोबेल पारितोषिकही मिळाले. 

हवामान बदलचा अहवाल  | the climate change report 

त्या अहवालानुसार सध्या जागतिक हवामान बदलाचा प्रवाह सुरू झाला आहे. सृष्टीच्या हवामानात कमालीचे बदल घडत आहेत. म्हणूनच हवामान बदलाचे आव्हान मानवजातीपुढील पर्यावरणीय आव्हानांपैकी सर्वात महत्त्वाचे आहे आणि हवामान बदलाची समस्या सर्व जगाला आता भेडसावत आहे. अन्नउत्पादन , नैसर्गिक परिसंस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य अशा सर्वच महत्त्वाच्या बाबींवर त्याचा परिणाम होणार आहे, त्यासोबत त्याचे विपरीत परिणाम शेतीवर आणि कृषीशी निगडीत व इतर उद्योगधंद्यांवर होत आहेत. अगोदरच शेतीच्या उत्पादन वाढीच्या तंत्रात किडी व रोगामुळे होणार्‍या नुकसानीचा महत्त्वाचा अडथळा आहे. त्यामध्येच या हवामान बदलामुळे तापमान वाढ, अनियमीत पाऊस, हवेतील आर्द्रतेचा व तापमानाचा अचानक चढ-उतार अशा बाबींची सुरूवात झाली आहे. भविष्यात किडी-रोगांच्या उत्पत्तीमध्ये निश्‍चितच वाढ होण्याची किंवा काहीवेळा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. 

हवामान बदलाचे दुष्परिणाम | Effects of climate change

  • वाढणारे तापमान:  जागतिक तापमान दरवर्षी वाढत आहे, ज्यामुळे वारंवार आणि तीव्र उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर, शेतीवर आणि परिसंस्थांवर ( इकोसिस्टिम)  होतांना दिसत आहे. 
  • वितळणारे बर्फ आणि हिमनद्या: तापमानवाढीमुळे बर्फाचे तुकडे आणि हिमनद्या वितळत आहेत, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. यामुळे किनारपट्टीवरील समुदाय आणि परिसंस्थांना धोका निर्माण झाला आहे.
  • समुद्र पातळी वाढ: वितळणारा बर्फ आणि समुद्राच्या पाण्याचा विस्तार समुद्राची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरतो. यामुळे सखल किनारपट्टी भागांना धोका निर्माण होतो, ज्यामुळे पूर आणि जमिनीची धूप वाढते.
  • अत्यंत हवामानातील घटना: चक्रीवादळ, दुष्काळ, पूर, जंगलातील आग आणि वादळे यासह हवामानाच्या घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढण्याशी हवामान बदलाचा संबंध आहे. 
  • महासागर आम्लीकरण: वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड (CO2) पातळी वाढल्याने केवळ ग्रह गरम होत नाही तर महासागरांद्वारे CO2 चे शोषणही वाढते. यामुळे महासागरातील आम्लीकरण होते, जे समुद्री जीवनाला, विशेषतः कॅल्शियम कार्बोनेट कवच असलेल्या जीवांना, जसे की कोरल आणि काही शेलफिशला हानी पोहोचवू शकते. 
  • इकोसिस्टममध्ये व्यत्यय: तापमान आणि पर्जन्यमानातील बदल पर्यावरणीय प्रणालींमध्ये व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे वनस्पती आणि प्राणी प्रजाती प्रभावित होतात. काही प्रजातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले जाऊ शकते किंवा नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. 
  • जैवविविधतेचे नुकसान:  अधिवास नष्ट होणे, बदलणारे तापमान आणि हवामानातील तीव्र घटना जैवविविधतेच्या नुकसानास कारणीभूत ठरतात. काही प्रजाती बदललेल्या वातावरणात जगण्यासाठी संघर्ष करू शकतात, ज्यामुळे घट किंवा नामशेष होऊ शकतात.
  • कृषी नमुन्यातील बदल: तापमान आणि पर्जन्यमानातील बदल कृषी उत्पादकतेवर परिणाम करू शकतात. वाढत्या हंगामातील बदल, पाण्याच्या उपलब्धतेतील बदल आणि कीटक आणि रोगांचे वाढते धोके अन्न सुरक्षेवर परिणाम करू शकतात.
  • वाढलेले आरोग्य धोके: हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. उष्णतेच्या लहरींमुळे उष्णतेशी संबंधित आजार, रोग वाहकांच्या वितरणात बदल (जसे की डास), आणि जलजन्य रोगांचे बदललेले नमुने होऊ शकतात.
  • पाणी टंचाई: उच्च तापमानामुळे पर्जन्यमानात बदल आणि बाष्पीभवन वाढल्याने काही प्रदेशात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. याचा परिणाम शेती, पाणीपुरवठा आणि परिसंस्थेवर होऊ शकतो.
  • स्थलांतर आणि विस्थापन: हवामान बदलाचे परिणाम, जसे की समुद्र पातळी वाढणे, हवामानाच्या तीव्र घटना आणि बदलत्या कृषी परिस्थितीमुळे लोकसंख्येचे स्थलांतर आणि विस्थापन होऊ शकते.

हवामान बदलाचे पशुंपक्षांवर होणारे परिणाम | Impact of Climate Change on Livestock

हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून पशुपक्षीसुद्धा सुटले नाहीत. काही भागात पंचेचाळीस अंश सेल्सीयस पेक्षा जास्त तापमान वाढल्यास गाभण जनावरांचा गर्भपात झाल्याचे दिसून आले आहे. तसेच जनावरांच्या ह्दयाचे ठोके वाढणे, श्‍वासोच्छवासचा दर वाढणे, भूक मंदावणे, जनावरांची हालचाल मंदावणे, उन्हाळ्यात हगवणीचे प्रमाण वाढणे, प्रजोत्पादनात २०-२५ टक्के घट होणे असे परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे. तसेच शेळ्या - मेंढ्यामंध्ये लोकर गळणे आणि कोंबड्यांचा मृत्युदर वाढणे अशा परिणामांनाही सुरूवात झाली आहे. 

हवामान बदलाचे पीक उत्पादनावर होणारे परिणाम | Climate Change effects on crop production

हवामान बदलामुळे रोग व कीड निर्मीतीस पोषक ठरेल आणि रोग व कीडींचा सुलभपणे प्रसार होईल, अशी रोग आणि कीडींसाठी सुलभ परिस्थिती निर्माण होते. वनस्पतीच्या पृष्ठभागावरील प्रकाशाची तीव्रता, तापमान, आर्द्रता इत्यादी घटक की जे वनस्पतीच्या वाढीवर परिणाम करतात असे घटक वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकत्रित परिणाम दाखवित नाहीत. उदा. खरिपातील तूर, एरंडी पिकांची वाढ खूपच वाढली आणि शेंगा व बोंडे मात्र कमी लागली. काही ठिकाणी रब्बी ज्वारीतील पानातील हरितद्रव्य नाहीसे होऊन पाने लाल-पिवळी पडली आणि वाळली. त्यामुळे ज्वारीचा उतारा कमी आला. फळपिकांमध्ये फुल गळ आणि फळगळीचे प्रमाण असाधारणरित्या वाढले. ज्या कीड-रोगांवर आतापर्यंत बर्‍यापैकी नियंत्रण मिळविल्या गेले होते असे किरकोळ नुकसान करणार्‍या वर्गात मोडणारे कीड व रोग आता भरपूर प्रमाणात नुकसान करत आहेत. तसेच त्यांना नियंत्रण करणार्‍या औषधांना सुद्धा असे कीड व रोग आता दाद देत नाही. 

शेतीबाबत उपाययोजना- Agriculture Measures

नेहमाचीच्या संशोधन पद्धतीत बदल करून आता हवामानातील बदल व पाणी उपलब्धतेनुसार पीक उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसीत करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासोबत कमी, मध्यम व जास्त कालावधीच्या हवामान अंदाजाची अचुकता व व्याप्ती वाढविणे, हवामान बदलासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करणे, जैवतंत्राचा उपयोग करून हवामानबदलाला सहन करू शकतील असे वाण निर्माण करणे, पीके बदलत्या हवामान कशी तग धरू शकतील यावर संशोधन केल्यापेक्षा बदलत्या हवामानला तोंड देणारे वाण विकसीत करणे अशा उपयायोजना करायला हव्यात. तसेच जनावरांच्या गोठ्यात गारवा निर्माण करणार्‍या उपाययोजना विकसीत करणे, उच्च तापमानामध्ये तग धरू शकतील अशा जनावरांच्या जातींची निवड पद्धतीने पैदास करणे हे पशुसंवर्धनासाठी महत्त्वाचे उपाय ठरू शकतील. त्यासोबत उच्च तापमानामुळे पशुपक्षांच्या प्रजनन क्षमतेवर होणारे विपरीत परिणाम व उपाय यावर संशोधन करणे, वातावरणातील बदलामुळे जनावरे व पक्षी यांच्यामध्ये दिसून येणारे आजार यावर संशोक्षन करणे अशाप्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतात. 

निष्कर्ष ( Conclusion)-

हवामान बदल होण्याची कारणे आणि त्याचे मानवावर आणि खास करून शेतीवर होणारे दुष्परिणाम काय आहेत हे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. आता हवामान बदलाचे दुष्परिणाम निश्‍चित झाले असून उपाययोजनांवर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. हवामान बदलाचे संभाव्य दुष्परिणाम समस्त मानवजातीसाठी आहे हे सर्वमान्य असले तरी त्याचे दुष्परिणाम विशेषत: भारतासारख्या इतर विषुववृत्तीय प्रदेशांतील विकसनशील देशांसाठी सर्व प्रथम घातक ठरणार आहेत. हे लक्षात घेऊन ते दुष्परिणाम ओळखण्याची आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा.

- योगेश रमाकांत भोलाणे
हवामान बदलाचे नवे संकट | A new crisis of climate change हवामान बदलाचे नवे संकट | A new crisis of climate change Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जुलै १७, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.